ह्या भारतमातेचे होते खंदे सुपुत्र, पाशमुक्त भारतमाता हेच त्यांच्या जीवनाचे सूत्र. हृदयात "वंदे मातरम" हा एकच मंत्र, म्हणूनच करू शकले ते भारतभूला स्वतंत्र ॥१॥

कित्येकांनी दिली प्राणांची आहुती, हसत हसत चढले फासावरती. देहत्याग केला समाधान चित्ती, बलिदानाने त्यांच्या पावन झाली ही धरती ॥२॥

आनंदे मृत्यूलाही कवटाळले ज्यांनी, असहाय वेदना होत असतील आज त्यांच्या मनी. स्वातंत्र्य मिळविले का आम्ही याच कारणी, गरीबीने गांजलेली जनता गब्बर भ्रष्ट राजकारणी ॥३॥

वारस्यात मिळालेल्या स्वातंत्र्याची नाही का आपल्याला किंमत, का बदल घडवायची उरलीच नाहीये हिंमत. परीस्थिती कितीही चिघळली आम्ही मुकपणे संमत, शेजारी पाहतोय मनापासून सगळी गंमत  ॥४॥

चिरनिद्रेतून येऊ दे जरा जाग, पुन्हा मनांमध्ये लागू दे आग. बनूया सद्परीवर्तनाचा आपण भाग, तरच सिद्ध होईल स्वातंत्र्यसैनिकांनी पेटवलेला याग ॥५॥