मराठी लोकसाहित्याच्या संकलक असलेल्या डॉ.सरोजिनी बाबर यांचे नाव लोकसंस्कृतीच्या अनुषंगाने अग्रक्रमाने घ्यावे लागते. जाणीवपूर्वक, डोळसपणे, प्रांजळ तळमळीने केलेल्या लोकसाहित्य संकलनामुळे डॉ.बाबर यांचे लोकसाहित्यात महत्वाचे योगदान आहे. याबरोबरच त्यांनी विविध वाङ्मय प्रकारातून विपुल लेखन केले आहे. इ.स.1961 मध्ये महाराष्ट्र लोकसाहित्य समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. या माध्यमातून डॉ.बाबर यांनी अफाट संकलन करुन लोकसाहित्य व लोकसंस्कृती विषयक विविध ग्रंथांचे संपादन केले.
डॉ.सरोजिनी बाबर यांचा जन्म इ.स.1920 मध्ये झाला. श्री.कृष्णराव बाबर व गंगूबाई बाबर या दांपत्याच्यापोटी जन्मलेल्या सरोजिनी लहानपणीच पोलिओच्या बळी ठरल्याने पायाने थोडया अधू झाल्या होत्या. मुलीचा जन्म म्हणजे दुर्दैव समजल्या जाणाऱ्या काळात श्री.कृष्णराव बाबर यांनी आपल्या मुलींना उच्च शिक्षण दिले. स्त्रियांविषयी उदार दृष्टिकोन असलेल्या वडिलांकडून आनुवंषिक सद्विचारांचा, सत्कार्याचा, समाजसेवेचा संस्कार व वारसा सरोजिनी यांना मिळाला होता. इ.स. 1951 मध्ये पी.एच.डी पदवी त्यांनी मिळवली. पुढे त्यांच्या समाजशिक्षणमाला व लोकसाहित्यामधल्या प्रचंड योगदानामुळे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने त्यांना इ.स.1982 साली डी.एस्सी. (डॉक्टर ऑफ सायन्स) ही पदवी प्रदान करुन त्यांचा सन्मान केला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इ.स. 1952 ते 1957 या काळात त्या तत्कालीन मुंबई प्रांताच्या विधानसभा सदस्या होत्या. महाराष्ट्र विधानसभेच्या त्या इ.स.1964 ते 1966 या कालावधीत सदस्या होत्या. इ.स. 1968 ते 1974 या काळात त्या राज्यसभेच्या सदस्या होत्या.
लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांची व्यासंगी वृत्ती, विद्वत्ता, मराठी साहित्याबद्दलचे प्रेम जागृत होते हे विविध प्रसंगांतून लक्षात येते. यासंबंधी विविध अनुभव त्यांनी त्यांच्या ‘माझ्या खुणा माझ्या मला’ या आत्मकथनवजा पुस्तकात मांडले आहेत. राजकारणात नाते महत्वाचे नसून विचार प्रभावी ठरतो, या विचाराच्या डॉ.बाबर होत्या. संयुक्त महाराष्ट्रासंबंधी प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्यावर प्रभावी विचार मांडून वक्तृत्वशैलीच्या जोरावर होकारार्थी ठरावासाठी त्या मते मिळवू शकल्या. विधानसभेत निवडून गेल्यावर स्त्रीजीवनविषयक सुधारणा घडवून आणू अशी इच्छा धरुनच त्यांनी विधानसभेतील स्थान ग्रहण केले. एखादा कायदा तयार होताना स्त्रियांच्या कल्याणाची गोष्ट कोणती होईल आणि तो विशिष्ट कायदा सर्वसामान्य स्त्रीजीवनाला कसा पोषक ठरेल याचा अभ्यास करुनच डॉ.बाबर सभागृहात प्रश्नोत्तरांच्या तासाच्यावेळी नियमितपणे हजर राहत असत.
भारतीय समाजातील लोकसंस्कृतीची आज सर्व जगभर चर्चा होते आहे. लोकसंस्कृतीची अभिव्यक्ती प्रामुख्याने भारतीय कुटुंबव्यवस्थेतील स्त्री व तिच्या जीवन वाटचालीतून आविष्कृत होते. आपल्या संस्कृतीत विविध सण, उत्सव, कुलाचार, पारंपरिक चालीरिती व विधींना महत्वाचे स्थान आहे. या लोकसंस्कृतीचे समग्र दर्शन डॉ.सरोजिनी बाबर यांच्या लोकसाहित्यविषयक लेखनातून घडते. डॉ.बाबर यांनी ‘स्त्री’ व ‘लोकसंस्कृती’ केंद्रस्थानी ठेवून विविध वाङ्मयप्रकारातून लेखन केले आहे. डॉ.बाबर यांचे लोकसाहित्यविषयक लेखन व संपादने तसेच त्यांच्या कादंबऱ्या, कथा, काव्य, स्फूटलेखन व बालसाहित्यातूनही लोकसंस्कृती व स्त्रीजीवन विविध घटकांव्दारे आविष्कृत झालेले दिसते. संस्कृतीचा वसा घेऊन जीवनाकडे पाहणाऱ्या व्यक्ती डॉ.बाबर यांनी आपल्या लेखनातून रेखाटल्या. यामध्ये प्रामुख्याने लोकसंस्कृतीतील स्त्री दिसते. स्त्रीजीवनातील विविध प्रसंग रेखाटून स्त्रीमनातील विविध भावभावनांचे चित्रण डॉ.बाबर यांनी केले. सामाजिक परिस्थितीमुळे स्त्रीजीवनातील नियंत्रणे, बंधने इ.चा संदर्भही त्यांनी स्त्रीचित्रणाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. पारंपरिक स्त्रीजीवन चित्रण, नातेसंबंधातील विसंवाद, ढासळलेली नीतिमूल्ये आणि त्यासाठी संस्कारशील आदर्शवादही त्यांनी मांडला.
डॉ.बाबर यांच्या लेखनात स्त्रीजीवनाशी निगडीत पुरुषजीवन व सर्व नातेसंबंधही तितक्याच समर्थपणे आलेले दिसतात. भारतीय संस्कृती व लोकपरंपरा याविषयी असणारे डॉ.बाबर यांचे प्रेम, ओढ पात्रांशी व परिस्थितीशी तडजोड करताना दिसतात.
मराठीच्या प्रारंभकाळापासून ते 1960 या कालावधीत स्त्रियांनी मराठीत लिहिलेल्या वाङ्मयाचा परामर्श तसेच स्त्रीशिक्षणाच्या वाटचालीतील विविध घटकांचा अभ्यास करुन स्त्रीशिक्षणाचा आढावा डॉ.बाबर यांनी आपल्या संशोधन लेखनातून घेतला आहे.
डॉ.बाबर यांनी संकलन करुन या संकलित सामग्रीला संग्राहक म्हणून स्वतःकडे न ठेवता हा लोकवाङ्मयाचा ठेवा त्यांनी वैयक्तिकरित्या तसेच लोकसाहित्य समितीच्या माध्यमातून ग्रंथरुपाने अ